सीमेपलिकडची कचकच

जगाचे नेतृत्व करण्याच्या नादात अमेरिकेतील नेतृत्वाचे स्वतःच्याच घराकडे दुर्लक्ष झाले आणि जागतिक मंदीचे संकट निर्माण झाले. बेईमानीचा पैसा पचत नाही या उक्तीनुरूप काहीसा प्रकार तेथे राष्ट्रीय स्तरावर झाल्यासारखे स्पष्ट दिसत आहे. इतर राष्ट्रांना शस्त्रास्त्रे विकून कोंबड्यांसारखे झुंजवायचे आणि त्या संपन्नेतवर मजा करायची ही हीननीती त्यांनी कैक दशके राबविली आहे. याचेच, उत्तम उदाहरण म्हणजे, एका दहशतवादी राष्ट्रास आर्थिक आणि सैनिकी मदत देण्याचे अमेरिकेचे धोरण अजूनही चालूच आहे. दुर्दैवाची बाब ही की ब्रिटिशांची “फोडा अन् झोडा” ही नीती अमेरिकाही तशीच राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. वारंवार, भारताकडून पुरावे दिल्या जात असूनही, तसेच अमेरिकन नागरिकांची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर २६ सप्टेंबर २००८ केलेल्या हल्ल्यात हत्या करूनही, पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यास अमेरिका तयार नाही. या सर्वातूनच, शस्त्रास्त्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशासाठी अमेरिकन नेतृत्व कोणत्याही थराला जाऊ शकते असा निष्कर्ष अतिशय खेदाने काढावा लागतो.

वास्तविक भारताची सामरिक शक्ती आणि आर्थिक कुवत बघता, व्यवस्थित ध्येयधोरणे राबविल्यास स्वबळावर आपण सामर्थ्यसंपन्नतेचे अलौकिक शिखर गाठू शकतो. एकीकडे आपण जागतिक बँकेकडून विकासासाठी कर्जे घेतो आणि दुसरीकडे स्वातंत्र्यानंतर सहा दशके लोटूनही शस्त्रास्त्रे, लढाऊ सामग्री, विमाने, जहाजे विकत घेतो. हे भिकेचे डोहाळे कशासाठी? त्याऐवजी, आपल्याच देशात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर देऊन, परदेशात जाणारा हा पैसा वाचवला तर देशाचा सर्वंकष विकास होण्याच्या एक मोठाच मार्ग मोकळा होईल. त्यासाठी लागणारी सामग्री पुरवणारे अनेक उद्योग उदयाला येतील आणि भारतातील बेरोजगारी आणि गरिबीसारख्या अडचणीही भराभर सोडवता येतील. अर्थात, यात अनेक आव्हानेही आहेतच. परंतू, आपण स्वबळावर महासंगणक, चांद्रयानासारखे प्रकल्प, अण्वस्त्रनिर्मितीसारख्या अनेक गोष्टी करू शकतो, हे आपल्या येथे अनेक तल्लख शास्त्रज्ञांनी आणि कुशल तंत्रज्ञांनी दाखवून दिले आहे आणि पुढेही दाखवून देतीलच. त्यामुळे कुठलेही आव्हान आपला देश समर्थपणे पेलू शकतो हेही तितकेच खरे! पक्षीय राजकारणात काटाकाटी खेळणाऱ्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल काय हाच खरा कोट्यावधी मोलाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

अमेरिकन नागरिक भलेही चांगला असेल, परंतू एक देश म्हणून त्यांची धोरणे आपल्या देशासाठी हानीकारकच ठरत आलेली आहेत हे इतिहासाच्या कुठल्याही पानावर केवळ नजर जरी टाकली तरी चटकन दिसून येते. तोंडाने गांधीजींचा उदो-उदो करतांनाच त्यांचा हात भारतद्वेष्ट्या राष्ट्रांना अब्जावधी रूपयांची लष्करी मदत करण्यात गुंतलेला असतो. त्या पैशातूनच दरवर्षी हजारो निर्दोष भारतीयांचे रक्त सांडल्या जाते. वर्तनातला हा ढोंगीपणा शेंबड्या पोरालाही दिसू शकतो. त्यामुळे या सर्व बाबींचा साकल्याने विचार करण्याची निकड आता अधिक तीव्र झालेली आहे. आज भारताच्या सुप्त शक्तीचा अंदाज घेता, किमान, म्हणजे अगदी प्रत्येक बाबतीत सगळ्यात कमी संख्या धरली तरीसुद्धा गेलाबाजार अमेरिकेला सामरिक बाबतीत प्रत्येक स्तरावर लीलया मागे टाकण्याची शक्ती येथे आहे. परंतू, तिला सुप्त रूपातून दृश्य रूपात येईस्तोवर आव्हानांचे अनेक हिमालय पार करायचे आहेत.

तोवर, सीमेपलिकडचे एक झुरळाएवढे राष्ट्रही या महान देशाला जागतिक मंचावर जेरीस आणू शकते. झुरळाला शत्रू मानण्याऐवजी, झुरळाला मदत करणाऱ्या लांडग्या-कोल्ह्यांचे शत्रूवत् वर्तन वठणीवर आणणे अधिक गरजेचे आहे. बहुधा भारतातील सुप्त रूपातील या शक्तीची जाणीव असल्यानेही भयगंडापोटीही इथल्या राजकीय व सामजिक परिस्थितीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याची इच्छा या लांडग्या-कोल्ह्यांना होत असावी. ते काही असले तरी, भारताने या सर्व बाबतीत मधुर भाषण आणि कठोर वर्तन करण्याची गरज पुन्हा-पुन्हा अधोरेखित झालेली आहे. सुरेश भटांच्या शब्दात, “कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली?” खरोखरच, हा एक अनाकलनीय प्रश्न आहे.

अर्थात, आपल्याला खरेच प्रकाशाकडे जायचे आहे की अंधाराकडे हे आपल्या सर्वांना ठरवायचे आहे. “मला काय त्याचे” ही वैचारिक पद्धत भारताला रानटी राजवटींच्या गर्तेत घेऊन गेली आणि त्यातून बाहेर पडण्यास अनेक शतके लोटली. पारतंत्र्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जागरूक नागरिकत्व हे स्वातंत्र्याचे ऋण आजन्म फेडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

टिपा – हा लेख वाचणाऱ्या माझ्या अमेरिकन मित्र-मैत्रीणींना मी सांगू इच्छितो की त्यांचा आणि त्यांच्या देशाच्या चांगल्या गुणांचा मी निश्चितच आदर करतो. परंतू, ज्याप्रमाणे हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकतांना त्यांच्या देशातील लोकांनी स्वतःच्या देशहितास सर्वोच्च प्राधान्य दिले त्याचप्रमाणे सगळ्या जगातील प्रत्येक देशातील नागरिकांना आपापल्या देशाच्या हितास सर्वोच्च महत्त्व देण्याचा अधिकार आहे. भविष्यातील कटूता टाळण्यासाठी अमेरिकन जनतेने, आगीचे खेळ टाळून सकारात्मक कामे करण्यासाठी अमेरिकन नेतृत्वावर, दबाव टाकावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. त्यानेच वसुंधरा सुजलाम्-सुफलाम् आणि सुरक्षित होऊ शकेल. तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही काय देऊ इच्छिता हे तुम्हालाच आत्ताच ठरवायचे आहे.

जय भारत!

(शैलेश श. खांडेकर)